अमरावती विभागाचा बारावीचा निकाल ९२.०९ टक्के

July 16,2020

अमरावती : १६जुलै  - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला आहे. अमरावती विभागाचा निकाल 92.09 टक्के लागला असून विभागात सर्वाधिक 94.22 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या बुलडाणा जिल्ह्याने निकालाच्या टक्केवारीत बाजी मारली आहे.

अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ वाशिम आणि बुलडाणा हे पाच जिल्हे मिळून एकूण 1 लाख 43 हजार 323 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 42 हजार 725 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून एकूण 1 लाख 31 हजार 434 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये मुलांची संख्या 70 हजार 88 आणि मुलींची संख्या 61 हजार 346 इतकी होती. 

अमरावती जिल्ह्यात 35 हजार 828 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षा दिली असून 32 हजार 358 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. अकोला जिल्ह्यात 25 हजार 450 विद्यार्थ्यांपैकी 23 हजार 109, यवतमाळ जिल्ह्यात 31 हजार 600 पैकी 29 हजार 25, वाशिम जिल्ह्यात 18 हजार 680 पैकी 17 हजार 575 आणि बुलडाणा जिल्ह्यात 31 हजार 167 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 367 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.