“खोके सरकारने गद्दारांच्या ४० मतदारसंघामध्ये…”, आदित्य ठाकरेंचा खेडमधून राज्य सरकारवर हल्लाबोल

November 25,2023

आदित्य ठाकरेंचा सध्या कोकण दौरा सुरू आहे. कोकणातील विविध गाव-तालुक्यांत जाऊन ते ठाकरे गटाची मोट बांधत आहेत. मोठ्या प्रमाणात नागरिकांना ठाकरे गटात सामिल करून घेत आहेत. तसंच, गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी खळा बैठकीचंही आयोजन केलं आहे. आज आदित्य ठाकरे खेड येथे असून तेथे त्यांनी ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली.

“खळा बैठकीला कालपासून सुरुवात केली. हा शब्द परवापासून इतका पॉप्युलर झाला की ग्रामस्थांपेक्षा माध्यमातील लोक जास्त येतील अशी भीती होती”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“आता गणपती, दसरा, दिवाळी सण गेले. पुढच्यावर्षी निवडणुकीचा सण येणार आहे. इथं जसं भगवं वातावरण दिसत आहे, तसं महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात भगवं वातावरण निर्माण होत चाललेलं आहे. उत्तराखंड, केदारनाथ, बद्रीनाथ, छत्तीसगढ, झारखंडला जाऊन आलो. तिथं बदलाचे वारे वाहू लागले आहेत. कर्नाटकात भाजपाने सर्वकाही वापरलं, पण त्यांचं ४० टक्क्यांचं भ्रष्टचार सरकार जनतेने पाडलं आणि नवं सरकार बसवलं. मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या पाचही ठिकाणी काँग्रेस जिंकणार आणि आपली इंडिया आघाडी अग्रेसर राहणार”, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

“लोकसभा असो वा विधानसभा, निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आणि महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. हे जर खोटं असतं तर खोके सरकारने गद्दारांच्या ४० मतदारसंघामध्ये निवडणुका घेतल्या असत्या”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

“हे चित्र सगळीकडे आहे. लोक निवडणुकीला घाबरत आहेत. पक्षातून राजीनामा देतात, सगळेच राजीनामा देतात. तो लोकशाहीचा भाग आहे. पण ते पदाचा राजीनामा देतात, निवडणुकीला सामोरे जातात आणि जिंकतात. पण आपलं खोके सरकार पळालं सुरतला. तिथून गुवाहाटी आणि मग गोव्याला आलं आणि आता बिळात लपलं आहे. आताही प्रत्येकवेळी दिल्लीला पळत असतं”, अशीही टीका त्यांनी केली.