सचिन वाझेंचे पत्र भाजपच्या कार्यालयातून येत असावं - हसन मुश्रीफ

April 08,2021

नवी दिल्ली : ८ एप्रिल - निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लिहिलेलं पत्र हे भाजपने दिलं असावं असं माझं म्हणणं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते आणखी एक मंत्री राजीनामा देईल. त्यावरुन तर भाजपच्या कार्यालयातून हे पत्र येत असावं असं मला वाटतं, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. मुंबईत आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आणि महाविकास आघाडीवर झालेल्या आरोपांना उत्तर दिलं. हसन मुश्रीफ म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की आणखी एक मंत्री राजीनामा देईल. त्यांचं वक्तव्य आणि सचिन वाझे यांचं पत्र हा निश्चितच योगायोग नाही. वाझे यांचं पत्र हे भाजपने दिलेलं पत्र असावं असं माझं म्हणणं आहे”

सचिन वाझे यांना विरोध असतानाही त्यांची नियुक्ती करण्यात आली. वाझे हे परमबीर सिंग यांनाच रिपोर्ट करत होते. वाझे ऑफिसला येताना बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिजने येत होते तर मग कारवाई का केली नाही? तुरुंगातून पत्र लिहिणं हे योग्य नाही. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

अनिल परब यांनी आपल्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगितलं. भाजपने यातून बोध घेणं गरजेचं आहे. राफेल भ्रष्टचार आपण थांबवला, कोणतीही चौकशी करु दिली नाही. मात्र इतर देशांच्या पेपरमध्ये हा विषय आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यालयातून हे पत्र येत असावं असं मला वाटतं, असा दावा हसन मुश्रीफांनी केला.

कामगार विभागाचा मी कालच कार्यभार स्वीकारला. कामगारांचे प्रश्न आहेत. कामगारांनी कोणत्याही राज्यात जाऊ नये. आम्ही त्यांची व्यवस्था करु, असं आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परब यांनीही आपल्याला वसूली करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट वाझे यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वाझेंनी केलेल्या या आरोपांमुळेच अनिल परब यांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दोन मुलींची शपथ घेण्याची वेळ आली आहे. परब यांनी वाझे यांचे सर्वच आरोप फेटाळून लावले आहेत.