महाराष्ट्राला लसींचा कोटा कमी दिला - राजेश टोपे यांचा आरोप

January 17,2021

मुंबई : १७ जानेवारी - राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा मागणीपेक्षा कमी कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केल्याचा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राला १७.५0 लाख कोरोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता आहे. आठ लाख आरोग्य कर्मचार्यांनी लसीकरणासाठी कोविन अँपवर रजिस्ट्रेशन केले आहे. आम्हाला कोरोना प्रतिबंधक लसीचे १0 लाख डोस मिळाले. आम्हाला अजून साडेसात लाख लसींच्या डोसची आवश्यकता आहे, असे राजेश टोपे म्हणाले. 

याआधी सुद्धा राजेश टोपे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी केंद्र सरकारने राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा आरोप फेटाळून लावला होता. सर्व राज्यांच्या आरोग्य कर्मचार्यांच्या डेटाबेसनुसार त्यांना डोसची संख्या पाठवण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. मंत्रालयाने यासंदर्भात ट्विटरवरून त्यावर प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली होती.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या १.६५ कोटी डोसच्या खरेदीची रक्कम राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या आरोग्य कर्मचार्यांच्या संख्येनुसार पाठवण्यात आली आहे. त्यामुळे लसीच्या डोसच्या वितरणामध्ये केंद्र सरकारने कोणत्याही राज्यासोबत भेदभाव केल्याचा प्रश्नच येत नाही. लसच्या डोस पुरवठ्याचा हा सुरुवातीचा लॉट असून यानंतर येत्या आठवड्यात तो नियमितपणे पाठवण्यात येणार असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले होते. राज्याला कमी डोस मिळाले हे सांगताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले होते की, आपल्याला केंद्र सरकारने एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. बफर स्टॉकसहित बोलायचे गेल्यास आपल्याला सतरा ते साडेसतरा डोसची गरज आहे. आज त्यापैकी नऊ ते साडेनऊ लाख आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. केंद्र सरकाराच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तीला पूर्ण डोस द्या. त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेत ५५ टक्के डोस आलेले आहेत. त्यामुळे आठ लाख लोकांचे लसीकरण करायचे असतानाही आम्हाला ५५ टक्के म्हणजेच साधारण पाच लाखांपर्यंत लसीकरण पूर्ण करणार आहोत.