भारताकडून पाकिस्तान सीमेवर ३ हजार अतिरिक्त जवान तैनात

September 20,2020

श्रीनगर : २० सप्टेंबर - जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आंतरराष्ट्रीय सीमेवरील अंमलीपदार्थांसह  शस्त्रांच्या तस्करीचा व  घुसखोरीचा पाकिस्तानचा डाव उधळून लावला आहे.  या कारवाईत अंमलीपदार्थांच्या साठ्याबरोबरच मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

बीएसएफच्या जवानांनी या कारवाईत घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरवत, अंमली पदार्थांचे ५८ पॅकेट्स दोन पिस्तुलं, चार मॅगझिन आणि शस्त्रसाठा जप्त केला आहे.

बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, संशयित तस्करांनी शनिवार आणि रविवारी रात्री आरएसपुरा सेक्टरच्या अरनिया भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, जो बीएसएफच्या जवानांनी तो अयशस्वी ठरवला.

भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, यासाठी दहशतवाद्यांना देखील पाठबळ दिले जात आहे. मात्र, पाकिस्तानचे हे प्रयत्न प्रत्येक वेळी अयशस्वी ठरवण्यात भारतीय जवानांना यश येत आहे. शिवाय, घुसखोरीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी व घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आता भारताकडून ‘एलओसी’वर अतिरिक्त तीन हजार जवान तैनात करण्यात आले आहेत.