पुणे - नाशिक रेल्वे लाईन विक्रमी वेळात होणार पूर्ण

August 05,2020

मुंबई : ५ ऑगस्ट - पुण्याहून नाशिकला जाण्यासाठी बसने पाच ते सहा तास लागतात. आता हे अंतर अवघ्या दोन तासांत कापता येणार आहे. राज्य सरकारने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करू. तसेच हा प्रकल्प पूर्ण करताना चीनची उत्पादने आणि सेवांचा उपयोग केला जाणर नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अवघ्या दोन तासांत पुण्याहून नाशिकला जाणे शक्य होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रलायात एक बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रर डेव्हलेपमेंट कार्पोरेशन लिमिटेड तथा 'महारेल'च्यावतीने पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. कोरोनाचे संकट असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने पुणे - नाशिक हा रेल्वे प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण करू असं सांगतानाच या माध्यमातून प्रवासी सेवांसह कृषी उत्पादने आणि मालवाहतुकीला गती मिळणार आहे. पुणे-नाशिक शहरांसह पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही गती मिळेल, असं अजित पवार यांनी सांगितले.

पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात अव्वल आहेत. या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याचबरोबर या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अत्यंत कमी खर्चात पूर्ण होणारा या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. अवघ्या पाऊणे दोन तासात हे अंतर कापले जाणार आहे. 

त्याचबरोबर सध्याच्या भूसंपादनाच्या प्रचलित कायद्याप्रमाणे बाधित शेतकर्यांना मोबदला दिला जाणार आहे. या मार्गावरील रेल्वेस्थानकात बाधित प्रकल्पग्रस्तांसह स्थानिकांना व्यवसायासाठी स्टॉल देताना प्राधान्य दिले जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामातही स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकर्यांना त्यांच्या कृषीमालाच्या वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन त्यांच्या सहकार्याने हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात येणार असून या प्रकल्पासाठी चिनी उत्पादने किंवा सेवा उपयोगात आणल्या जाणार नाहीत, असंही ते म्हणाले.

यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार सरोज आहिरे यांनी विविध सूचना मांडल्या.