राम मंदिर उभे राहण्याआधी आपलं मन मंदिर तयार व्हायला हवे - डॉ. मोहन भागवत

August 05,2020

अयोध्या : ५ ऑगस्ट - “प्रभु श्रीराम यांच्या चरित्रातील पुरुषार्थ आपल्या कणाकणात आहे. आपल्या सगळ्यात राम आहे. इथे अयोध्येत भव्य मंदिर बनेल. सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे. दायित्व दिलेलं आहे. आता आपल्या सगळ्या मनातील अयोध्येला सजवायचं आहे. सगळ्यांची उन्नती करणारा धर्म, त्याचा ध्वज खांद्यावर घेऊन सगळ्या विश्वाला सुखशांती देणारा भारत आपण निर्माण करू शकू, त्यासाठी आपल्याला मनातील अयोध्या बनवायची आहे. जसं जसं मंदिर बनत जाईल, तसं तसं हे करायचं आहे. राम मंदिर उभं राहण्याआधी आपलं मन मंदिर तयार व्हायला हवं. त्याची गरज आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन  भागवत यांनी अयोध्येत राममंदिर भूमिपूजनानंतर बोलताना केले. 

अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर मोहन भागवत यांनी संबोधित केलं.

सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यापासून मंदिराच्या कामाला सुरूवात कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर मंदिराची पायाभरणी झाली असून, लवकरच कामालाही सुरूवात होणार आहे. असे सांगून  सरसंघचालक भागवत म्हणाले, “ हा आनंदाचा क्षण आहे. एक संकल्प घेतला गेला होता. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरासांनी  सांगितलं होतं की, २०-३० वर्ष काम करावं लागेल. तेव्हा हे पूर्ण होईल. प्रयत्न केले. अनेकांनी बलिदान दिलं. पदयात्रा करणारे आडवाणीही आज घरातून हा कार्यक्रम बघत असतील. अनेकजण उपस्थित राहू शकले असते, पण परिस्थिती तशी नाहीये. जगाचं कल्याण करणारा भारत स्वतःच्या कल्याणाचा शुभारंभ आज आणि या व्यवस्थेचं नेतृत्व ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हस्ते होतेय. याचाही आनंद आहे,” असं भागवत म्हणाले.

राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली असल्याचे प्रतिपादन  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी बोलताना केले. ५०० वर्षांपूर्वीच्या स्वप्नाची पूर्तता होत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

“या क्षणामागे ५०० वर्षांचा संघर्ष, साधना आहे. भारताची लोकतांत्रिक मूल्य, कायदेशीर प्रक्रिया, संविधानाची संमती या सगळ्या प्रक्रियेतून जात आज हा दिवस दिसतो आहे. या क्षणाची वाट पाहत अनेक पिढ्या गेल्या. अनेक महापुरुषांनी बलिदान दिलं. आपल्या डोळ्यांसमोर राम मंदिर उभं राहावं अशी अनेकांची इच्छा होती. नरेंद्र मोदींनी कायदेशीर तसंच शांततेच्या मार्गाने समस्येचं निराकरण कसं केलं जातं हे दाखवून दिलं आहे. नरेंद्र मोदींमुळे हा क्षण सत्यात उतरला आहे,” असे  योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.