अजून किती लॉकडाऊन वाढवणार : देवेंद्र फडणवीस

July 05,2020

मुंबई : ५जुलै - कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचा आता सरकारला विचार करावा लागणार आहे. अन्यथा नागरिकांना आणखी मोठय़ा आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता आणखी किती दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे, असा सवाल विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारला केला आहे. सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी एक कार्यपद्धती ठरवायला हवी, असेही फडणवीस यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस शनिवारी पनवेल आणि नवी मुंबईच्या दौर्‍यावर होते. दरम्यान, पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पनवेलमधील कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर बोलताना फडणवीस म्हणाले की, जिल्हा उपरुग्णालयाची क्षमता आता संपली आहे. पनवेलचा कोरोना संक्रमणचा दर ४५ टक्के होता आणि त्याच वेळी देशात संक्रमणाचा दर ६.४ टक्के होता. त्यामुळे येथे चाचण्या वाढवण्याची आवश्यकता आहे. महापालिके ची आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी आरोग्य विभाग आणि वैदकीय शिक्षण विभागाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ( एमएमआर ) मध्ये टेस्टिंगची व्यवस्था आणि आयसोलेशन तसेच उपचाराची व्यवस्था वाढवावी लागेल, कारण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.

राज्य सरकारकडून महापालिकांना कोविड-१९ करीता एका नव्या पैशाची मदत करण्यात आली नाही, असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. आरोग्य व्यवस्था जरी सरकारची जबाबदारी असेल तरी महापालिकांवर बोजा आहे. काही मोठ्या महापालिका सोडल्या तर अनेक महापालिकांची कोविड-१९ चा सामना करण्याची क्षमता नाही. राज्य सरकार आणि महापालिकांमध्ये समन्वयाचा अभाव जाणवत असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. एका छोट्याशा गावासाठी ठीक आहे. पण मुंबई आणि पुणे सारख्या शहरासाठी छोट्या-छोट्या गोष्टीसांठी सुद्धा दोन किलोमीटर सहज जाव लागते. अनलॉकच्या काळात लोकांना कामासाठी बाहेर जावं लागत आहे. ती अट कुठून आली मला माहीत नाही, पण रद्द झाली ते योग्य झाले, असे फडणवीस म्हणाले.

लॉकडाऊनमुळे पोलिसांवरही विनाकारण भार वाढत आहे. पोलिस आणि नागरिकांमध्ये संघर्ष होणार नाही, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. आताच्या परिस्थितीत लोकांना कोरोनाचा धोका समजलेला आहे. पण अनेक नागरिक आवश्यक कामासाठी बाहेर पडतात. गेल्या चार महिन्यांत पोलिस अत्यंत थकलेले आहेत. आपला जीव धोक्यात टाकून पोलिस कर्तव्य बजावताहेत. पोलिसांचा कोविडने मृत्यू झाले तर एका अर्थाने ते शहीद झाले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.