जाहीर केलेल्या पॅकेजचे काय झाले? भाजपचा राज्याला सवाल

April 30,2021

मुंबई : ३० एप्रिल - करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं लावलेला लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनचा निर्णय घेताना सरकारनं काही वर्गांसाठी आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, ही मदत अद्याप संबंधितांना मिळाली नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे.
महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी सांगा जगायचं कसं? १४ एप्रिलपासून संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केला, त्यावेळी जे पॅकेज जाहीर केले त्याचे काय झाले सांगा. आता आणखी पंधरा दिवस लॉकडाऊन वाढवला आहे, सामान्यांनी कसे जगायचे सांगा?,' असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.
लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडी सरकारनं पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी १५०० रुपये तर १२ लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी १५०० रुपये देण्याचे जाहीर केले होते. यातील किती जणांना प्रत्यक्ष मदत दिली सांगा?,' अशी विचारणा उपाध्ये यांनी केली आहे.

'अपयश झाकण्यासाठी कांगावा व अकांडतांडव केले जाते. पण, जनतेला मदत करायची वेळ आल्यावर हे सरकार कोडगे बनते. दुर्बल घटकांना मदत करायची सरकारची इच्छाच नाही. संचारबंदीच्या नावाखाली लॉकडाऊन लागू केलेल्या निर्णयाला आज १५ दिवस उलटले तरी आधीच तुटपुंजी जाहीर केलेली मदत ही या वसुली सरकारला लाभार्थ्यांना देता आलेली नाही,' अशी टीका उपाध्ये यांनी केली आहे.