लसीच्या तुटवड्याबाबत माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा - देवेंद्र फडणवीस

April 07,2021

मुंबई : ७ एप्रिल - राज्यात 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केलीय. लसीच्या तुटवड्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता त्यांनी राज्यातील मंत्री, मुख्यमंत्री यांनी माध्यमांशी बोलण्यापेक्षा केंद्र सरकारशी संवाद साधावा, असा खोचक सल्ला दिलाय.  राज्य सरकारमधील मंत्री आणि नेते लसीकरणा संदर्भात करत असलेला आरोप चुकीचा आहे. राज्यातील लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक पुरवठा करण्यात येत असल्याचा दावाही फडणवीसांनी केलाय. केंद्र सरकारकडून देशभरात सर्वात जास्त लसी या महाराष्ट्राला दिल्या आहेत. भारत सरकार काही वेगळं आहे का? या गोष्टी माध्यमांशी बोलण्याऐवजी केंद्राशी चर्चा करणं गरजेचं आहे. अशी चर्चा केली जात नाही. माध्यमांमध्ये बोलायचं आणि हात झटकायचं हे बंद झालं पाहिजे. विरोधकांना म्हणायचं राजकारण करु नका आणि सरकारमधील मंत्री, मुख्यमंत्र्यांनीच राजकारण करायचं हे योग्य नाही, असंही फडणवीसांनी म्हटलंय.

राज्यात विकेंडला दोन दिवस लॉकडाऊन आणि अन्य पाच दिवस कडक निर्बंध लावले जातील असं सरकारकडून सांगण्यात आलं. पण आज सातही दिवस 100 टक्के लॉकडाऊन असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. कडक निर्बंध आवश्यक आहेत. पण आता जे निर्बंध घातले गेले आहेत, ते विचार न करता घातले गेलेत. मला 17 असोसिएशनचे लोक आतापर्यंत भेटले. आम्ही कोरोना उपाययोजनांबाबत सरकारला पूर्ण पाठिंबा दिलाय. पण आता कडक निर्बंधांऐवजी सातही दिवस पूर्ण लॉकडाऊन दिसतोय. यामुळे व्यापारी आणि छोटे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकाची फरफट होत असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने यावर चर्चा करुन मार्ग काढावा. अन्यथा उद्रेक होईल, असा सूचक इशाराही फडणवीसांनी राज्य सरकारला दिलाय