मनसुख हिरेन प्रकरणी शिवसेनेची भाजपवर टीका

March 08,2021

मुंबई : ८ मार्च - 'मृत्यू कुणाला चुकला आहे? त्यात अनैसर्गिक मृत्यू आप्तेष्टांना हलवून जातो. मनात संशय निर्माण करतात व राजकारणी त्यात भर घालतात. मनसुख मृत्यूप्रकरणी तपास सुरू असताना विरोधी पक्ष तेच करीत आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे' अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे.

'महाराष्ट्रात एका बाजूला पूजा चव्हाणच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असतानाच जिलेटीनने भरलेली गाडी उभी केली जाते व ती गाडी तशीच ठेवून चालक निघून जातो. सकाळी या गाडीचा संशय येतो व धावपळ सुरू होते. या सिनेमाची कथा-पटकथा प्रत्यक्षात पडद्यावर आली असती तर हा बिगबजेट सिनेमा पहिल्या शोलाच कोसळला असता, इतके कच्चे दुवे या रहस्यपटात आहेत. पण आता या फसलेल्या रहस्यपटाचा शेवट ‘हॉरर’ने घेतल्याने काहीतरी गडबड नक्कीच आहे. जी स्कॉर्पिओ गाडी सापडली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरीत्या मुंब्य्राच्या खाडीत सापडला आहे. मनसुख यांचा मृत्यू संशयास्पद, तितकाच रहस्यमय आहे' असं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे.

'विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना हे सर्व घडले आहे. ‘मारुती कांबळेचे काय झाले? ’प्रमाणे मनसुख हिरेनचे काय झाले या प्रश्नावर विधिमंडळात चौफेर हंगामा होऊ शकेल. कारण विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी शुक्रवारी मनसुखप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. पूजा चव्हाण, मनसुख हिरेन, स्फोटकांनी भरलेली गाडी हे सर्व कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातील विषय आहेत. विरोधी पक्षाने या सगळ्यांवर जोरकसपणे आपले मुद्दे मांडले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते. त्यांनी गृह खाते सांभाळले आहे. त्याचा फायदा त्यांना होतोच. पोलीस खात्याच्या संदर्भातील आतली माहितीही त्यांना मिळते. मनसुख प्रकरणातील काही वेगळी माहिती त्यांनी मांडली, पण फडणवीसांनी जाहीर केलेली माहिती म्हणजे अधिकृत तपास यंत्रणांचा अंतिम निष्कर्ष नाही, पण मनसुख प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक होईल व सरकारला उडवाउडवीची उत्तरे देऊन चालणार नाही' असंही सेनेनं सावधपणे उत्तर दिलं.

'सापडलेली गाडी हेच मोठे रहस्य आहे. ज्या परिसरात गाडी सापडली त्या परिसरात सुरक्षा व्यवस्था सरकारपेक्षा मजबूत आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सीसी टीव्ही आहेत. कुणाही ऐऱ्यागैऱ्यास तिकडे फिरकता येत नाही. अशातच एक स्फोटकांनी भरलेले बेवारस वाहन तेथे येतेच कसे? याप्रकरणी मुंबई-ठाण्यातील 800 हून जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, पण तपास इंचभरही पुढे सरकला नाही. मात्र आता तपासाचे एकमेव मुख्य दुवा असलेले मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.  मनसुख हिरेन यांच्या रहस्यमय मृत्यूने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. स्वतः मनसुख जीवानिशी गेले. ‘माझे वडील चांगले पोहणारे होते आणि आत्महत्या करणाऱ्यांपैकी ते नव्हते. त्यांना कोणताही ताण नव्हता. फोन आला आणि ते बाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाहीत,’ अशी माहिती मनसुखच्या मुलाने दिली. पण त्यांच्याकडील प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही' असंही सेनेनं म्हटलं आहे.