भाजपाच्या स्थापनादिनी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प करा: देवेंद्र फडणवीस नगरपालिका, नगरपंचायत सदस्यांशी संवादसेतू

April 05,2020

मुंबई, 5 एप्रिल -  उद्या 6 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आहे. तो सेवाकार्याच्याच माध्यमातून आपल्याला साजरा करायचा आहे. सुमारे 22 लाख लोकांपर्यंत आपण आतापर्यंत पोहोचलो आहोत. उद्या 25 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपला संकल्प असला पाहिजे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील कार्यकर्त्यांना केले.


राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमधील भाजपा नगरसेवकांशी त्यांनी ‘ऑडिओ ब्रीज’च्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी हे आवाहन केले. कोरोनाविरूद्ध लढताना आज आपण देशभरात लॉकडाऊनला सामोरे जातो आहोत. सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय असल्याने तो आवश्यक सुद्धा आहे. पण, या काळात गरजूंपर्यंत पोहोचणे, हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. विविध प्रकारच्या सेवा देताना आपण सुमारे 22 लाख लोकांपर्यंत आज पोहोचलो आहोत. पण, उद्या आपला स्थापना दिन असल्याने 25 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असे ते म्हणाले.


सोशल डिस्टान्सिंगचे नियम पाळताना कुणी एकटे आहेत, ही भावना सुद्धा त्यांच्यात यायला नको. त्यामुळे प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने आपल्या संपर्कातील किमान 100 लोकांना दूरध्वनी करून त्यांची ख्याली-खुशाली विचारायची आहे. त्यांना कुठली मदत हवी आहे का, याची माहिती घ्यायची आहे. यातून त्यांना आधार वाटेल आणि एकटेपणाची भावना येणार नाही, असेही आवाहन त्यांनी केले.


आज भाजपाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी तयार अन्न, अन्नधान्य वाटप करीत आहेत. स्वच्छतेसाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. रक्तदान, रोजंदारी कामगार, एवढेच नाही तर जी हॉटेल बंद आहेत, तेथील रोजंदारी कामगारांचीही काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या या युद्धात अतिशय चांगले काम सारेच कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक करीत आहेत. पण, नगरसेवकांची भूमिका यात अधिक आहे, त्यामुळे त्यांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.