दिल्लीतील लाठीहल्ल्याचा प्रकाश आंबेडकरांनी केला निषेध
January 27,2021अकोला : २७ जानेवारी - दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी आरएसएस आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा ट्रम्प होऊ नये, तसेच आरएसएस हे कधीच 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला मानत नसल्याचे म्हटले आहे.
नेहरू पार्क चौक येथे शेतकरी जागर मंचच्या ट्रॅक्टर रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी ते आले असताना, त्यांनी शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांवर झालेला हल्ला ही दुर्दैवी घटना आहे. देशाच्या दृष्टिकोनातून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. या दिवशी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज होतो, हे चुकीचे आहे. आम्ही या घटनेचा निषेध करतो. शासन संवेदनशील असलं पाहिजे. मोदी हे काही ट्रम्प नाही. पाच वर्षानंतर मोदीही जातील मात्र त्यांची अवस्था ट्रपसारखी होऊ नये, हीच अपेक्षा आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.