दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी १५ गुन्हे दाखल

January 27,2021

नवी दिल्ली : २७ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चा दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारात मोठ्याप्रमाणावर सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान तर झालंच, शिवाय ८६ पोलीस देखील जखमी झाले. या प्रकारणी आतापर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यापैकी ५ गुन्हे ईस्टर्न रेंजमध्ये दाखल केले गेले आहे.

ट्रॅक्टर मोर्चासाठी पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचे मोर्चेकरी शेतकऱ्यांकडून उल्लंघन केले गेले असल्याचा दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. तर, शेतकऱ्यांना भडकावल्या गेल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून केला गेला आहे. तर, या सर्व पार्श्वभूमीवर आज लाल किल्ला परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय, लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गेट देखील बंद करण्यात आलेले आहे.

जवळपास दोन महिन्यांपासून शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ऐन प्रजासत्ताक दिनी गालबोट लागलं. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान शेतकरी व पोलीस आमने-सामने आल्यानंतर हिंसेचा उद्रेक झाला. यातच शेतकऱ्यांच्या एका गटाने लाल किल्ल्याकडे कूच करत किल्ल्यावर ध्वज फडकावला.

तर, दुसरीकडे आयकर कार्यालयाच्या ऑफिसजवळ ट्रॅक्टर उलटल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. याशिवाय आंदोलक शेतकऱ्यांकडून आठ बसेस आणि १७ खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली.