पैसे न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय तुघलकी - विश्वास पाठक

January 20,2021

नागपूर : २० जानेवारी - राज्यात लॉकडाऊन काळात वाढीव दराने वीज बिल आकारल्यामुळे जनतेत आक्रोश असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. विरोधकांनीही यावरुन सरकारला धारेवर धरलेलं आहेच. असे असतानाच आता ‘महावितरण’ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश जाहीर केले आहेत. इतकंच नव्हे तर ग्राहकांनी जर वीज बिल भरले नाही, तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही, असंही ‘महावितरण’कडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हा वाद चिघळण्याची शक्यता असून विरोधी पक्षातील नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे.

 “पैसे भरले नाहीत तर वीज पुरवठा खंडित करू हे ऊर्जामंत्र्यांचे फर्मान तुघलकी आहे. याचा आम्ही निषेध करतो. महाराष्ट्राचा वीज ग्राहक अतिशय प्रामाणिक आहे. तो अडचणीत असल्यामुळे राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा करतो आहे. करोनाकाळाआधीची महावितरणची थकबाकी त्यांनी पूर्ण केली आहे. ग्राहक प्रामाणिकपणे वीज बिल भरणा करत आहेत. पण करोनाकाळात अव्वाच्या सव्वा चुकीची बिलं देण्यात आली असून त्यात सूट देण्याच्या नुसत्या घोषणा करण्यात आल्या. सरकारने ग्रामपंचायत निवडणुकांपर्यंत वाट पाहिली आणि निकालानंतर लगेच त्यांनी तुघलकी निर्णय घेतला. याचा भाजपा निषेध करत आहे”, असे रोखठोक मत भाजपाचे महाराष्ट्र मीडिया प्रमुख आणि ‘महावितरण’चे माजी संचालक विश्वास पाठक यांनी मांडले.

“ग्राहकांची वीज बिलं माफ करणं शक्य नाही असं सांगितलं जात आहे. पण ऊर्जा मंत्री स्वत: मात्र चार्टर्ड विमानाने फिरत आहेत. बिल्डर्सना ५०टक्के प्रिमियममध्ये सूट देण्यात आली आहे. ऊर्जा खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. सव्वा वर्षात चार-पाच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत असा निर्णय हा चुकीचा आहे”, असं ते म्हणाले.