काँग्रेसने उपस्थित केले लसीकरणाबद्दल प्रश्न
January 17,2021नवी दिल्ली : १७ जानेवारी - देशात सुरू असलेले लसीवरचे राजकारण अद्याप थांबलेले दिसत नाही. एकीकडे लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होताच, दुसरीकडे काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी मोदी सरकारला लसीकरणावरून काही प्रश्न विचारले आहेत. लस जर एवढीच सुरक्षित आणि विश्वसनीय आहे व तिच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करण्यापलिकडची आहे. तर, मग असे कसे होऊ शकते? की सरकारशी निगडीत कुणीही लस टोचून घेण्यासाठी पुढाकार घेतला नाही. जगातील अन्य देशांमध्ये असे झाले आहे. असा प्रश्न मनीष तिवारी यांनी उपस्थित केला आहे.
करोना महामारी विरोधात सुरू असलेल्या देशाच्या लढाईच्यादृष्टीने आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचा आज देशात शुभारंभ झाला. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगद्वारे संवाद साधून, या लसीकरणास सुरूवात करून दिली. अनेक नामांकीत डॉक्टारांनी कोव्हॅक्सिनच्या परिणाम कारकतेबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. मनीष तिवारी यांनी लशींच्या वापरास मान्यता मिळण्याच्या प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यासाठी काही धोरणात्मक चौकट नाही. अनेक प्रख्यात डॉक्टरांनी सरकारसमोर कोव्हॅक्सिनची परिणामकारकता आणि सुरक्षेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की, कोणती लस घ्यावी याची निवड नागरिकांना करता येणार नाही. असे देखील मनीष तिवारी यांनी बोलून दाखवले आहे.
आपल्या शास्त्रज्ञांना आणि तज्जञांना जेव्हा मेड इन इंडिया लसीच्या सुरक्षा आणि परिणामकारकतेबद्दल खात्री झाली, तेव्हाच त्यांनी या लसींच्या आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली.