नागपूर इन्फोचे संपादकीय सल्लागार अविनाश पाठक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित होणार

January 11,2021

नागपूर : ११ जानेवारी - अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यम पत्रकार संघ नाशिक यांचे विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कारासाठी यंदा नागपुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक अविनाश पाठक यांची निवड करण्यात आली आहे. रुपये २१ हजार रोख, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १३ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ४ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे आयोजित समारंभात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते  माजी मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे हस्ते हा पुरस्कार पाठक  यांना प्रदान करण्यात येणार आहे.  

सुमारे ४५ वर्ष पत्रकारितेत सक्रिय असलेल्या अविनाश पाठक यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यम, मुद्रित माध्यम आणि समाजमाध्यम या तिन्हिवर  पत्रकारिता करून आपला ठसा उमटवला आहे. मुंबई दूरदर्शनसाठी १० वर्ष त्यांनी वृत्तछायाचित्रकार  म्हणून काम केले असून नागपूर दूरदर्शनच्या उदघाटनाच्या दिवशी प्रसारित झालेला विशेष माहितीपट सारस्वती जन्मभू चे चित्रीकरण करण्याचा मानही त्यांना मिळाला होता. केंद्र सरकारच्या फिल्म्स डिव्हिजनसाठीही त्यांनी विविध चित्रीकरणे  केली आहेत.  मुद्रित माध्यमांमध्ये काम करताना त्यांनी महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठित वृत्तपत्रांमध्ये आपल्या सेवा दिल्या आहेत.  हिंदुस्थान समाचार या बहुभाषिक वृत्तसंस्थेत विदर्भ केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले आहे.  

रामटेकच्या गडावरून या नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी ८ वर्ष काम केले आहे. या काळात रामटेकच्या गडावरूनच्या विविध दिवाळी अंकांना २५ च्या वर प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले आहेत. 

अविनाश पाठक  यांची आतापर्यंत १३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात मराठी वाङ्मय व्यवहार , चिंतन आणि चिंता हे संपादित पुस्तक, पूर्णांक सुखाचा ही  लघु कादंबरी, काळ्या कोळशाची काळी  कहाणी हे कोळसा घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे पुस्तक, डावपेच आणि सत्तेच्या सावलीत हे राजकीय कथासंग्रह, आठवणीतले नेते, गाभाऱ्यातला कवडसा, माझ्या खिडकीतले आकाश आणि थोडं आंबट थोडं गोड  हे चार ललित लेखांचे संग्रह तसेच दाहक वास्तव, मागोवा घटितांचा, कालप्रवाहाच्या वळणावरून आणि  दृष्टिक्षेप हे वैचारिक लेखांचे संग्रह या पुस्तकांचा समावेश आहे. लवकरच म्हणजे २४ जानेवारी २०२१ रोजी अविनाश पाठक  लिखित हितगुज या ललितलेखसंग्रहाचे प्रकाशनही होत आहे. 

अविनाश पाठक लिखित मराठी वाङ्मय व्यवहार चिंतन आणि चिंता, पूर्णांक सुखाचा, डावपेच आणि आठवणीतले नेते ही  पुस्तके  विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झालेली आहेत. अविनाश पाठक  संपादित रामटेकच्या गडावरून या दिवाळी अंकानेही २५ च्या वर प्रतिष्ठित पुरस्कार मिळविलेले  आहेत. याशिवाय पत्रकारितेतील योगदानाबद्दल पाठक  यांना  नागपूरकर भोसले परिवाराचा राजरत्न पुरस्कार, मातोश्री पुरस्कार, बहिणाई पुरस्कार, महाराष्ट्रदीप  पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी  सन्मानित करण्यात आले आहे. 

सध्या अविनाश पाठक हे नागपूर इन्फो या न्यूज पोर्टलचे संपादकीय सल्लागार म्हणून कार्यरत असून त्याचबरोबर गावकरी नाशिक, नवशक्ती मुंबई, बित्तंबातमी,ठाणे आणि श्रमिक एकजूट नांदेड या दैनिकात नियमित लेखन करीत आहेत.