बेताल वक्तव्याबद्दल राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी - बच्चू कडू यांची मागणी

December 03,2020

अमरावती : ३ डिसेंबर - मागील काही दिवसांपासून पंजाब, हरयाणा, राजस्थान आदी राज्यातील हजारो शेतकरी हे केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांना कृषी कायद्याला विरोधच करायचा आहे तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे, असे बेताल वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारीया यांनी केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी समाचार घेतला असून कटारियांनी तत्काळ या शेतकऱ्यांची माफी मागावी अन्यथा त्यांचे तोंड काळे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा कडू यांनी दिला आहे.

बच्चू कडू म्हणाले, की रतनलाल कटारिया हे केंद्रीय राज्यमंत्री आहेत. त्यांनी शेतकऱ्यांबाबत हे वक्तव्य करणे चुकीचे आहे. तुम्ही जर शेतकऱ्यांसाठी मरणाची भाषा वापरत असाल तर मग आम्ही तुम्हाला मारण्यासाठी यायचे का, असा सवाल कडू यांनी केला आहे.

एकतर शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यांसाठी प्रतिसाद न देणे, त्यांना सहानुभूती देण्याऐवजी तुम्ही जर त्यांना मारण्याची भाषा करत असाल तर आम्हाला आंदोलन सोडून तुम्हाला कुठे पाठवायचे हे ठरवावे लागेल, असे कडू म्हणाले.

रतनलाल कटारिया यांनी आता शेतकऱ्यांची तत्काळ माफी मागितली पाहिजे, अन्यथा आम्ही त्यांचे तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही, इशारा कडू यांनी दिला आहे.