हरियाणात शेतकऱ्यांवर दंगलीचे गुन्हे दाखल

November 29,2020

नवी दिल्ली : २९ नोव्हेंबर - ‘दिल्ली चलो’ आंदोलनातील अनेक शेतकऱ्यांवर हरयाणात खुनाचा प्रयत्न व दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून भारतीय किसान युनियनचे राज्य प्रमुख गुरुनाम सिंग चारुनी यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल असे आरोप ठेवले आहेत.

२६ नोव्हेंबर रोजी कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), कलम १४७ (दंगल), कलम १४९ (बेकायदा एकत्र येणे), कलम १८६ (सरकारी कामात अडथळा), कलम २६९ ( संसर्ग पसरवून लोकांचा जीव धोक्यात आणणे) या अन्वये शेतकऱ्यांवर पाराओ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबाला छावणी भागात हजारो शेतकरी एकत्र जमलेले असताना हेड कॉन्स्टेबल प्रदीप कुमार यांच्या तक्रारीवरून दिल्लीकडे आगेकूच करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. चारुनी व इतर अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून अंबालातील मोहरा खेडय़ात ते जमले होते.

पोलीस उपअधीक्षक राम कुमार यांनी सांगितले की, चारूनी यांना मोर्चा पुढे नेऊ नका असे सांगण्यात आले होते. काही पोलीस अधिकारी हल्ल्यातून वाचले आहेत. आंदोलकांनी कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे कलम १८८ अन्वये त्यांच्यावर आज्ञाभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी हरयाणाचे पोलीस महासंचालक मनोज यादव यांनी सांगितले की, राज्यातील पोलिसांनी शेतकरी अडथळे मोडत असतानाही संयमाने काम केले आहे.