महिलांची छेड काढणाऱ्या आरोपींचे फोटो शहरात लावणार - उत्तर प्रदेश सरकारचा निर्णय

September 24,2020

लखनऊ : २४ सप्टेंबर - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यामध्ये कोणालाही महिलांची छेड काढण्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली तर शहरामध्ये त्या आरोपीचे पोस्टर लावण्यात येणार आहेत. योगी सरकारने यापद्धतीचा निर्णय सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान केला होता. सरकारी संपत्तीचे नुकासान करणाऱ्यांचे फोटो योगी सरकारने चौका चौकांमध्ये लावले होते.

महिलांची छेड काढणाऱ्यांचे फोटो लावण्याच्या पोलिसांच्या या मोहिमेला मिशन दुराचारी असं नाव देण्यात आलं आहे. या सर्व मोहिमेची जबाबदारी पोलीस खात्याकडे देण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत महिला पोलीस अधिकारी शहरांमधील प्रमुख ठिकाणी गस्त घालतील आणि महिलांची छेड काढणाऱ्यांवर नजर ठेवतील. राज्यामध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर योगींनी हा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर मुलींची छेड काढणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी असा आदेश मुख्यमंत्यांनी अधिकाऱ्यांनी दिला आहे. कारवाई करण्याबरोबरच या व्यक्तींचे फोटो शहरातील चौकांमध्ये लावण्यात यावेत असंही योगींनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

योगी यांनी काय आदेश दिलेत?

> महिलांविरोधातील कोणत्याही गुन्ह्यामधील आरोपींना महिला पोलिसांच्या हस्तेच दंड आणि शिक्षा करावी

> महिला पोलिसांना या छेडछाड करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी नियुक्त करण्यात यावे

> या आरोपींना मदत करणाऱ्यांनाही सोडू नये, या लोकांची नावंही सर्वांसमोर उघड करण्यात यावीत

> ज्याप्रमाणे अॅण्टी रोमियो स्कॉडच्या माध्यमातू महिलांची छेड काढणाऱ्यांना धडा शिकवण्यात यश आलं त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस स्थानकाने या नवीन मोहिमेत सहभागी होऊन महिलांविरोधातील गुन्हे कामी होतील यासाठी प्रयत्न करावेत.

> कोणत्याही पोलीस स्थानकाच्या हद्दीत महिलांविरोधात एखादा गुन्हा घडला तर तेथील बीट इनचार्ज, पोलीस स्थानकातील प्रमुख अधिकारी आणि सर्कल ऑफिसर जबाबदार असतील.

महिला आणि मुलींविरोधात होणाऱ्या छेडछाड, बलात्कार, लैंगिक शोषणासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपींना मदत करणाऱ्यांची नावंही समोर आणली गेली पाहिजेत असं योगींनी म्हटलं आहे. असं केल्यास एखाद्या गुन्ह्यामध्ये मदत करणाऱ्यांच्या मनातही बदनामीसंदर्भातील भिती निर्माण होईल असं मुख्यमंत्री म्हणाले.