ही तर देवेंद्र फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी - बाळासाहेब थोरात

September 20,2020

मुंबई : २० सप्टेंबर - “डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी जीडीपी  नोंदवला, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात सरासरी विकास वाढीचा दर ७.५% राहिला, त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला. असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे.” अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

याचबरोबर थोरात यांनी विविध मुद्यांवरून मोदी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. “डॉ. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील उच्चांकी विकासदर पाहून, पोटशूळ झालेल्या मोदी सरकारने विकासदराची वाढ मोजण्याचे परिमाण बदलून, अपयश झाकण्याचा प्रयत्न केला पण तो ही अपयशी ठरला. कारण पुढे प्रत्येक तिमाहीत विकासदर मोदींच्या विश्वासहर्तेप्रमाणे वेगाने घसरत आहे. याउलट अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली रसातळ काय असतो, याची अनुभूती जनतेला झाली आहे. याच तिमाहीत देशाच्या जीडीपीने उणे २३.९ टक्के अधोगतीचा दर गाठलेला आहे. गेल्या सहा वर्षात भारताच्या विकास दराला सातत्याने उतरती कळा लागल्याचे आपण पहात आहोत.” असं त्यांनी म्हटलं आहे.

बेरोजगारीच्या मुद्यावरून मोदी सरकारवर टीका करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “या वर्षी इतिहासात प्रथमच उणे ९ विकास दर राहण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय संस्था व्यक्त करत आहेत. गेल्या ४६ वर्षातील उच्चांकी बेरोजगारीचा दर हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच भारताने नोंदवला आहे.दर वर्षी २ कोटी रोजगार देणार असे आश्वासन देणाऱ्या मोदींनी आतापर्यंत १२ कोटी रोजगार निर्माण करण्याऐवजी असलेले १२ कोटी रोजगार घालवले. GST परतावा राज्यांना देणे कायद्याने बंधनकारक असताना केंद्र सरकार हात वर करत आहे. मोदींच्या प्रतापाने देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.”

बँक क्षेत्र रसातळाला गेले असल्याचे सांगत, “आपण चीनला बेटकुळ्या फुगवून दाखवत आहोत असा दिखावा करायचा आणि चिनी बँकांकडून कर्ज घेऊन भारतात घुसखोरी करणा-या चीनला क्लीन चीट द्यायची, हे मोदींच्या काळातच होत आहे. मोदींच्या काळात रिझर्व्ह बँकेतून लाखो कोटी रुपये काढून घेतले, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या विकण्याचा सपाटा सुरु आहे. बँकिंग क्षेत्र रसातळाल गेले असून बँकांना लुटणारे मेहुल चोक्सी, नीरव मोदी सारखे ३८ घोटाळेबाज देश सोडून पळून गेले आहेत. देशातील अनेक उद्योगधंदे बंद होत असताना केवळ मोदींच्या काही मित्रांच्या हाती देशाचे उद्योग रहावेत असे प्रयत्न मोदी सरकार करत आहे.” असा आरोपही त्यांनी मोदी सरकारवर केला.