अल - कायदाच्या ९ अतिरेक्यांना पश्चिम बंगाल आणि केरळात केली अटक

September 20,2020

नवी दिल्ली/कोलकाता : २० सप्टेंबर - बरेच प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अल् कायदा या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने पुन्हा एकदा भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला, पण राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएच्या विविध पथकांनी पश्चिम बंगाल आणि केरळात छापेमारी करीत, या संघटनेच्या नऊ अतिरेक्यांना अटक केली आणि हा डावही उधळून लावला.

 शनिवारी पहाटे केरळमधील एर्नाकुलम् आणि पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे छापेमारी करण्यात आली. भारतात पाय रोवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल् कायदाला हा मोठा धक्का मानला जात आहे. पश्चिम बंगाल व केरळसह विविध राज्यांत अल् कायदा सक्रिय होत असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. विविध भागात दहशतवादी हल्ले करण्याची या संघटनेची योजना होती. बंगालमधून 6 आणि केरळमधून 3 अतिरेक्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली.

 या अतिरेक्यांजवळून मोठ्या प्रमाणात डिजिटल वस्तू, आक्षेपार्ह दस्तावेज, जिहादी साहित्य, बंदुका, स्फोटके तयार करण्यासाठी लागणार्या वस्तू आदी सामग्री ताब्यात घेण्यात आली आहे. फटाक्यांसाठी लागणार्या बारूदचा वापर आयईडी तयार करण्यासाठी करण्यात येत होता. यात हे सर्व अतिरेकी निष्णात होते. यातील काही अतिरेकी दिल्लीला जाण्याच्या तयारीत होते, असे प्रवक्ता म्हणाला.

 मुर्शिद हसन, याकुब बिश्वास, मोसर्फ हसन, नजमुस साकिब, अबु सुफियान, मैनुल मोंडल, लियू अहमद, अल् ममून कमाल, अतिर रेहमान अशी या अतिरेक्यांचे नावे आहेत. यातील हसन हा या टोळीचा म्होरक्या आहे. या सर्वांना पाकिस्तानातील त्यांच्या म्होरक्यांकडून आदेश मिळायचे. महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासोबतच, काही बड्या व्यक्तींची हत्या करण्याचा त्यांचा डाव होता.