कोरोनाचं संकट पाहाता कुंभमेळ्यातील कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं - पंतप्रधानांची सूचना

April 17,2021

नवी दिल्ली : १७ एप्रिल - देशात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. अशात हरिद्वार येथील महाकुंभमेळ्याला लाखोच्या संख्येनं साधू-संत आणि भाविक उपस्थित राहिले. शाही स्नानासाठीदेखील एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यानंतर अनेक संतांसह भाविकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह  आल्यानं एकच खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर कुंभ समाप्तीच्या घोषणेचं वृत्तही समोर येऊ लागलं. अशात आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, आचार्य महामंडलेश्वर पूज्य स्वामी अवधेशानंद गिरी जी यांच्यासोबत आज फोनवर बोलणं झालं. सर्व संतांच्या आरोग्याबाबत माहिती घेतली. सर्व संत प्रशासनाला प्रत्येक प्रकारचं सहकार्य करत आहेत. यासाठी मी संतांचे आभार व्यक्त केले. मी विनंती केली, की दोन शाही स्नान झाले आहेत आणि इथून पुढे कोरोनाचं संकट पाहाता कुंभ प्रतिकात्मकच ठेवलं जावं. यामुळे या संकटाविरोधातील लढाईला एक ताकद मिळेल.

कोरोनाचा वाढता प्रसार आणि हरिद्वार कुंभमध्ये  दररोज आढळणारे कोरोना रुग्ण पाहाता कुंभ समाप्तीची चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान गुरुवारी निरंजनी आखाड्यानं समाप्तीची घोषणा केली होती. आखाड्याचे सचिव महंत रवींद्र पुरी यांनी कुंभच्या समाप्तीची घोषणा करत सांगितलं, की कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आखाड्यानं असा निर्णय घेतला आहे, की 17 एप्रिलला कुंभ मेळा समाप्त केला जाईल. पुरी यांनी इतर आखाड्यांनाही मेळा समाप्त करण्याचं आवाहन केलं. मात्र, त्यांच्या या निर्णयाला काही आखाड्यांनी प्रचंड विरोधही दर्शवला. निरंजनी आखाड्याला अशा प्रकारची घोषणा करण्याचा अधिकारच नाही, असे इतर आखाड्यांमधील साधूंनी म्हटले आहे.

--